
वसंत ✒️धारा न्यूज नेटवर्क
राजना, ता. पुसद : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजना येथे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी दुसरी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहपूर्ण आणि शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली. शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसह विविध शैक्षणिक उपक्रम, अध्ययन निष्पत्ती, नवभारत साक्षरता अभियान आणि निपुण महाराष्ट्र यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. रंजीतभाऊ मस्के यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पारवा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. कैलास आव्हाड सर यांनी प्रास्ताविक करून शिक्षण परिषदेची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली. त्यानंतर श्री. होंडे सर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजना येथील शैक्षणिक कार्य, विविध उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी गावचे पोलीस पाटील श्री. श्रावण श्रीरामे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. विनोद पवार, श्री. मनोहर मस्के, श्री. ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
परिषदेत विविध शैक्षणिक विषयांवर तज्ज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले. श्री. आशिष दुधे सर यांनी नवभारत साक्षरता अभियान या महत्त्वपूर्ण उपक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्री. बनसोड सर यांनी अध्ययन निष्पत्ती या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील प्रगती मोजण्यासाठी आवश्यक बाबी स्पष्ट केल्या. तसेच श्री. कीर्तनकार सर यांनी निपुण महाराष्ट्र अभियान याबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या मूलभूत शैक्षणिक क्षमतांच्या विकासावर भर दिला.
दरम्यान, राजना जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर, शिस्तबद्ध व उत्कृष्ट परिपाठ सादर केला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थित शिक्षक व मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सहभागाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
यावेळी राजना शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेश काळे सर, श्री. चंद्रकांत मळगणे सर, श्री. आशिष दुधे सर, श्री. सुरेश धुर्वे सर, श्रीमती सिंधू चव्हाण, श्री. नंदू पवार तसेच पारवा केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण परिषदेमुळे शिक्षकांना विविध शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती आणि शासनाच्या शैक्षणिक अभियानांबाबत उपयुक्त माहिती मिळाली. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने नवनवीन शैक्षणिक पद्धतींचा अवलंब करावा, असा सूर परिषदेत उमटला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ शिक्षक श्री. सुरेश धुर्वे सर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, मुख्याध्यापक व शिक्षकांचे आभार मानले. आभार प्रदर्शनानंतर दुसऱ्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.




