
वसंत ✒️धारा न्यूज
पुसद प्रतिनिधी : पुसद तालुक्यातील दुर्गम भागातील राजना–लाखी रस्त्यावर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू करण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी बांधकाम पूर्ण झालेल्या या पुलाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे निदर्शनास आले असून, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपासून राजना–लाखी, लाखी–पुसद, भंडारी ब्राह्मणगाव, पारवा, पांढुर्णा या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. वारंवार मागणी करूनही या मार्गांच्या विकासाकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अखेर पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाल्याने नागरिकांना दर्जेदार कामाची अपेक्षा होती. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर केवळ दोन महिन्यांतच पुलावर भेगा पडल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ग्रामस्थांनी ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप केला असून, ठेकेदार व संबंधित लोकप्रतिनिधींमधील कथित संगनमतामुळे दर्जाहीन काम झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
राजना गावातील जागृत नागरिक गणेश कुमला राठोड यांनी पुलाची पाहणी करताना भेगा आढळून आल्याचे सांगितले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या राठोड यांनी प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास पुलावर बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. “नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे निकृष्ट काम कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
परिसरातील नागरिकांनी विद्यमान आमदार, माजी व आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच जांबबाजार सर्कलमधील इतर लोकप्रतिनिधींवरही विकासकामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. छोटे-मोठे राजकीय नेते निवडणुकीच्या काळात आश्वासने देतात; मात्र प्रत्यक्षात गावांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
राजना, भंडारी, ब्राह्मणगाव, लाखी, पारवा आणि पांढुर्णा या गावांतील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याने नागरिकांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर या मार्गांवरून प्रवास करणे अधिक धोकादायक बनते.
ग्रामस्थांनी पुलाच्या गुणवत्तेची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, पुलाची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करावी तसेच संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने विकसित करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.




