
पुसद, प्रतिनिधी (वसंत ✒️धारा न्यूज नेटवर्क ): पुसद तालुक्यातील माळ पठारावरील हजारो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या इसापूर धरणातून उपसा सिंचन योजना राबविण्याच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विषयाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या योजनेबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा बैठक पार पडली. या बैठकीत योजनेच्या विविध तांत्रिक, प्रशासकीय व आर्थिक बाबींवर चर्चा करण्यात आली असून, योजनेबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याने माळ पठारावरील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बैठकीस राज्याचे राज्यमंत्री मा. श्री. इंद्रनील नाईक यांनी विशेष पुढाकार घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेसाठी त्यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला असून, त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा महत्त्वाचा विषय निर्णयाच्या दिशेने पुढे सरकत असल्याची भावना शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केली.
बैठकीस पुसद नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई नाईक, मा. श्री. मकरंद पाटील, विधान परिषदेचे मा. आमदार प्राजक्त तनपुरे तसेच माळ पठार शेतकरी प्रतिनिधी श्री. बी. जी. सर, श्री. विजय जाधव, श्री. संजय चव्हाण, श्री. जामंतराव राठोड, श्री. श्रीकांत चव्हाण, श्री. भाऊराव जाधव पाटील, श्री. सुनील ढाले आणि श्री. सुभाष ठाकरे (वसंतवाडी) उपस्थित होते.
बैठकीत माळ पठारावरील सिंचनाची गरज, शेतीसमोरील पाण्याचा प्रश्न, इसापूर धरणातील उपलब्ध जलसाठ्याचा प्रभावी वापर आणि उपसा सिंचन योजनेची अंमलबजावणी याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. ही योजना मार्गी लागल्यास माळ पठारावरील मोठ्या क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊन शेती उत्पादनात वाढ, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे आणि परिसराच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या महत्त्वपूर्ण विषयावर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल जलसंपदा मंत्री मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांचे तसेच या योजनेसाठी सातत्याने अथक पाठपुरावा करणारे राज्यमंत्री मा. श्री. इंद्रनील नाईक यांचे शेतकरी प्रतिनिधींनी मनःपूर्वक आभार मानले.
माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी पोहोचविण्याचे पाहिलेले स्वप्न या योजनेच्या माध्यमातून लवकरच प्रत्यक्षात उतरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. आता शासनस्तरावरील पुढील निर्णयाकडे माळ पठारावरील हजारो शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून, ही योजना लवकरात लवकर मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी, अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे.




